पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेगुरवमध्ये रविवारी (दि. १) दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घेतला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिबीरात सहभागी दिव्यांगांची आस्थेने चौकशी केली. हे शिबीर दिव्यांगांना न्यूनगंडातून बाहेर काढून जगण्याची नवी उमेद आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मसन्मान मिळवून देईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
पिंपळेगुरव येथील जगताप पाटील कॉम्प्लेक्समध्ये हे मोफत जयपूर फूट शिबीर पार पडले. यावेळी महापौर माई ढोरे, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, शारदा सोनवणे, नगरसेवक सागर आंगोळकर, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते, गोपाळ माळेकर, विठ्ठल भोईर, विनोद तापकीर, राजू सावंत, संदीप गाडे, शेखर चिंचवडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या विविध भागातील गरजू दिव्यांगांनी शिबीराला हजेरी लावली. त्यामध्ये अपघात, मधुमेह, रक्त वाहिन्यांचे आजार, गँगरीन व इतर कारणांमुळे पाय गमावलेल्या दिव्यांगांचा समावेश होता. प्रत्येक दिव्यांगाची नोंदणी करून तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. जयपूर फूट बसविण्यासाठी त्यांची योग्य मापे घेण्यात आली. आता या मापानुसार जयपूर फूट तयार करून दिले जाणार आहे. अजूनही अनेक गरजू दिव्यांगांना या शिबीराची माहिती मिळाली नसेल किंवा काही कारणास्तव शिबीरापर्यंत पोचता आले नसेल अशांना मोफत जयपूर फूट मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी मदत सुरू राहील, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “शारीरिकदृष्ट्या आपण इतरांपेक्षा कमकुवत असल्याने या स्पर्धेत टिकाव कसा धरायचा असा न्यूनगंड दिव्यांगांमध्ये निर्माण होतो. दिव्यांगांना या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर अनेक दिव्यांगांना जगण्याची नवी उमेद देईल. तसेच त्यांना आत्मसन्मानही मिळवून देईल. कृत्रिम हातापायांमुळे नवजीवन प्राप्त करून देण्याचा या शिबीराचा उद्देश आहे. कृत्रिम अवयव वापरण्यास अगदी सोपे असून या अवयवांच्या सहाय्याने रुग्णांना पूर्वीप्रमाणेच चालण्यासह दैनंदिन जीवनातील सर्व कामे करता येतात. समाजाच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगांना आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.”